Tuesday 21 August 2018

मुडागड

शिवारण्यात दडलेला - मुडागड


प्रतिक्षा ! एखादया गोष्टीची प्रतिक्षा करावी आणि प्रत्येक वेळी त्याच गोष्टीने आपल्याला हुलकावणी दयावी, असे काहीसे माझे ह्या किल्ल्याबाबत झाले. कधी माहिती अभावी तर कधी सोबती अभावी हा किल्ला मला झुलवत होता. तसे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १३ किल्ले त्या पैकी १२ किल्ले पाहून बरीच वर्षे लोटली परंतु ह्या तेराव्या किल्ल्याने मात्र मला फार प्रतिक्षा करायला लावली. कोल्हापूरच्या दुर्गमहार्षी श्री भगवान चिले सरांच्या पुस्तकात बरीच माहिती मिळाली पण ह्या पुस्तकाची आवृत्ती फारच जुनी होती. नवीन माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
शिवारण्य ! छत्रपती शाहू महाराजांच्या अभिनव उपक्रमाची व द्रष्टेपणाची साक्ष. पन्हाळा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पडसाळी गावानजीक छत्रपती शाहू महाराजांनी शिवारण्य नावाचे राखीव जंगल ठेवले होते. ह्याच शिवारण्याच्या गर्भात मुडागड नावाचा किल्ला दडलेला आहे. चहुबाजूने निबीड अशा जंगलाने वेढलेला मुडगड हा पर्यटक व प्रशासन या दोहोंकडूनही दुर्लक्षीत आहे. मुळात असा कोणतातरी किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे बय्राच लोकांना माहितही नाही. किल्ला पाहण्याची इच्छा तर सतत बळावत होती. किल्ल्याची सध्याची माहिती कोठून मिळवावी ह्या विवंचंनेत असतानाच फेसबुक वर शिवशक्ति प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सागरभाऊ कडव यांची मुडागड संदर्भात पोस्ट वाचनात आली. लगोलग सागरभाऊंना फोनवर संपर्क साधला. सागरभाऊंनी गडावर पोचण्यास लागणारी इत्यंभूत माहिती सांगितली आणि बजाऊन सांगितले की, पडसाळीतून वाटाड्या घेतल्याशिवाय जाऊ नका. माहिती मिळताच गड पाहण्याच्या इच्छेने उभारी घेतली. उन्हाळ्याची सुट्टी सुरु असल्याने सोबतीही लगेचच तयार झाले. एके दिवशी राम प्रहरी पाठीवर दुपारचे जेवण घेऊन आम्ही १० जण ५ बाईक वरुन बाहेर पडलो.
कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी पूर्वीच्या काळी काजीर्डा घाटाचा वापर केला जात असे. ह्या काजीर्डा घाटातून होणाय्रा वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी घाटापासून जवळच मुडागड बांधण्यात आला. चहूबाजूने घनदाट जंगल हेच शक्तिस्थान असलेला मुडागड समुद्रसपाटी पासून ६९८ मिटर ऊंचीवर आहे. कोल्हापूरहून मुडागड पाहण्यासाठी आपण दोन मार्गांचा वापर करु शकतो. एक कोल्हापूरहून गगनबावडा रस्त्याला असणारे कोदे गाव गाठून तेथून पुढे गड चढाईस सुरुवात करता येते अन्यथा कोल्हापूर – कळे – बाजारभोगव वरुन पुढे पडसाळी ह्या गावातून गडास रस्ता आहे. किल्ल्याभोवती असलेल्या  घनदाट जंगलाच्या चिलखतामुळे किल्ला नवख्या माणसास सापडणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. दोन्ही पैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास गडावर जाण्यास वाटाड्या घेणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. गडावर फारसे कोणी जात नसल्यामुळे गावातील काही मोजक्याच लोकांना गडावर जाण्याची वाट माहित आहे . कोदे गावातून वाटाड्या मिळणे तसे कठीण असल्यामुळे बरेचसे दुर्गप्रेमी पडसाळी गावातून गड पाहण्यास जातात.
तासाभरातच आमच्या गाडया कोल्हापूरच्या प्रसिध्द रंकाळातलावा वरुन पुढे गगनबावडा मार्गावरुन पडसाळीकडे धाऊ लागल्या. कळे गावातून आम्ही कोल्हापूर – गगनबावडा मार्ग सोडून अणुस्कुरा रस्त्याला असणारे बाजारभोगाव गाव गाठले. बाजारभोगाव मधून पुलाच्या अलीकडील डाव्या रस्त्याने किसरुळ – काळजवडे करत तासाभरातच आम्ही पडसाळीत पोहोचलो. पडसाळी गावात छोटेसे धरण असल्यामुळे दुर्गम भाग असूनसुध्दा रस्ता अतिशय चांगला होता. कळे ते पडसाळी हा मार्ग दुतर्फा असणारी विविध झाडे, शेती, डोंगर यामुळे निसर्गाची नाना रुपे पहायला मिळत होती.
                जेमतेम ४० – ५० उंबरे असणारे पडसाळी हे गाव. गावात धरण झालं म्हणून गावात रस्ता आणि विज तरी आली नाहीतर हे गाव तस दुर्गमच म्हणावे लागेल. आम्ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळे समोर पोहोचलो. सुट्टी असल्यमुळे शाळा बंद होती. दोन चार पोरं घरासमोरच्या अंगणात खेळत होती. त्या पोरांकडे गडाविषयी चौकशी करता डोंगराकडे हात करत म्हणाली, “ तीकडं कुटंतरी हाय बगा, आमी कवा जायाला न्हाई तिकडं”. इथे सागरभाऊंचे शब्द आठवले, वाटाडया घेतल्याशिवाय जाऊ नका. आता वाटाडया शोधण्याची मोहिम सुरु झाली. वर्षाऋतू जवळ असल्यामुळे गावातील जवळ – जवळ सर्वच कर्ती पुरुष मंडळी रानात कामाला गेली होती. त्या पोरांपैकी एकाला सोबत घेऊन रानात काम करणाय्रा एका माहितीगार गावकय्राला शोधून काढला. गड व परिसर दाखवण्याचे मानधन ठरवून घेतलं तसं तो म्हणाला, “तुमी व्हा म्होरं आणि शाळेम्होरं थांबा, मी आलोच हातातलं काम आटपून अर्ध्या घंटाभरात”. 
शाळेजवळ एका झाडाखाली बसून आणलेल्या शिध्यातलं थोडं न्याहारी म्हणून खाऊन घेतलं. अर्धातास म्हणत वाटडयानं यायला तास लावला. वाटाडया येताच आमच्या पायी प्रवासाला सुरुवात झाली. शाळेसमोरील पाणंदीने पुढे काही अंतर चालून गेल्यावर आम्ही नदीवर पोचलो. पूर्वी ह्या नदीला फक्त पावसाळ्यातच पाणी असे परंतु धरण झाल्यापासून ही नदी उन्हाळ्यात सुध्दा झुळूझुळू वाहत असते. येथून पुढे किंवा गडावर पाण्याचा काही स्त्रोत नसल्यामुळे येथेच नदीतील पाणी भरुन घेऊन गडचढाईला सुरुवात केली. डोंगरावर एक झरा असला तरी त्याला पाणी असण्याची शाश्वती नसते.
                  नदीपासून शेतवडीतून काही अंतर चालून गेल्यावर डोंगर चढाला लागलो. हा चढ चढून १५ ते २० मिनीटांत आम्ही डोंगर माथ्यावर पोचलो. डोंगरमाथ्या वरुन मागे वळून पाहिल्यावर डोंगराच्या कुशीत वसलेले पडसाळी गाव, धरण व धरणाच्या बॅकवॉटरचे विहंगम दृश्य नजरेस पडले. येथेच डोंगर कपारीत दाट झाडांच्या छायेत एक झरा आहे. पूर्वी हा झरा बारमाही होता पण सध्या त्याचे पाणी डिसेंबर जानेवारीतच आटते. येथून पुढचे जंगल हे अक्षरशः घनदाट वाढलेले होते. निसर्गदेवतेने घनदाट जंगलाच्या रुपाने आपल्या डोक्यावर छत्री धरल्याने येथून पुढचा प्रवास उन्हातसुध्दा सुखकर वाटत होता. येथून पुढे तीन डोंगर चढ व दोन पठारे चालल्यावर आम्ही गडमाथ्यावर येउन पोचलो. वाटेत ठिकठिकाणी पूर्वी आलेल्या दुर्गप्रेमींनी रस्ता ओळखण्यासाठी केलेल्या खुणा दिसल्या पण त्या अगदीच जुन्या वा पुसट होत्या. गडावर पोचण्यास आम्हाला साधारण दिड ते दोन तासांचा अवधी लागला. 
गडमाथ्यावरील जंगल अगदीच अस्ताव्यस्त वाढलेले असल्यामुळे गडमाथ्यावर फिरणे फारच कठीण होते. गडाचे सर्व बांधकाम, इमारती उध्वस्त झालेले असून त्यातून मोठमोठे वृक्ष उगवून आलेले आहेत. गडावर सध्या किल्ला असण्याची एकमेव खूण म्हणजे १० ते १५ फुटांची तटबंदी तेवढी पाहता आली. बाकी सर्व किल्ला हा जंगलाने गिळंकृत केला आहे. गडमाथ्यावर झाडीत सर्वत्र गडावरील इमारतींचे दगड विखुरलेले नजरेस आले. तटबंदी सोडता गड असण्याची कोणतीही ओळख माथ्यावर आढळली नाही.  गडाची ही अवस्था बघता मन अगदी विषण्ण झाले व त्याचबरोबर प्रशासनाच्या उदासीनतेची चीड आली.  गडमाथ्यावरुन आपल्याला गगनगड व विशाळगड हे किल्ले नजरेस येतात.
              गडाच्या तटाला लागूनच एक पायवाट कोदे गावाच्या दिशेने जाते. ह्या पायवटेने काही अंतर चालल्यावर जंगलातील प्राणी खाली गावात जाऊ नयेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी खोदलेला चर आपणास पाहता येतो. त्याचबरोबर हत्तींना जलक्रीडा करण्यासाठी करण्या साठी खोदलेला तलाव पाहता येतो. सदयस्थितीत हा चर झाडाझरोट्यांनी पूर्णपणे भरलेला तर तलाव कोरडा पडलेला दिसून आला. राजर्षी शाहू महाराजांनी हे जंगल शिवारण्य म्हणून राखीव ठेवले होते. ह्या जंगलात महाराजांनी एक अभिनव उपक्रम राबवला तो म्हणजे परदेशातून रानहत्ती आणून त्यांनी ते ह्या जंगलात सोडले. महत्त्वाचे  म्हणजे आपल्या नैसर्गिक अधिवासात नसूनसुध्दा त्यातील एका हत्तीणीने पिलाला जन्म दिला. याच अरण्याचा एक भाग म्हणून हे चर व तलाव राजर्षी शाहू महाराजांनी बांधले होते. रयतेबरोबरच निसर्गाचीही इतकी काळजी घेणारा राजा इतिहासात दुसरा झाला नसेल.
चर व तलाव पाहून परत गडमाथा गाठला. ३ – ४ तासांच्या पायपिटीमुळे व जंगलातील शुध्द हवेमुळे कडाडून भूक लागली होती. गडमाथ्यावरच झाडीत थोडी मोकळी जागा बघून सोबत आणलेली शिदोरी सोडली. भरपेट खाऊन थोडा वेळ येथेच विश्रांती घेऊन आल्या वाटेने गड उतरण्यास सुरुवात केली.
           जंगलात आम्हाला ऐन, बेहडा, हिरडा, पळस, अंजन, जांभूळ, उंबर इत्यादी वृक्ष तसेच नरक्या, दातपाडी, शिककाई सारख्या औषधी वनस्पती, तमालपत्री सारख्या मसाल्याच्या वनस्पती पहायला मिळाल्या. मनुष्यप्राणी चुकूनच जंगलात येत असल्यामुळे विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरे, किटक यांनी हे जंगल ओतप्रोत भरलेले आढळते. दयाळ,सर्पगरुड, कवडा, घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरीयाल, धोबी, इत्यादी पक्षी सहज नजरेस पडले. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु ब्लु मोरमॉन येथे ठिकठिकाणी बागडताना नजरेस आले. बरेचसे प्राणी हे निशाचर असल्याने व मानवाचा आवाज व गंधापासून दूर जाणारे असले तरी त्याच्या खाणा खुणा संबंध जंगलभर पसरलेल्या आढळतात. गवा, रानडुक्कर, ससा, साळींदर, भेकर इत्यादी शाकाहारी प्राण्यांची विष्ठा, पायाचे ठसे ठिकठिकाणी आढळले, दोन ठिकाणी तर अगदी पायवाटेवरच बिबळ्याची विष्ठा आढळली. 
उताराचा रस्ता, डोक्यावर झाडांची सावली व जंगलातला गार वारा यामुळे तासाभरातच आम्ही परत पडसाळीत पोहोचलो. पडसाळी गावातून जेमतेम ५ ते १० मिनीटांत आम्ही धरणाच्या भिंतीवर पोचलो. धरणाच्या निळ्याशार व थंडगार पाण्यात मस्त पैकी डुंबून चालून – चालून आलेला शिणवटा दुर केला व परतीच्या प्रवासाला लागालो.
          मुडागडाची दयनीय अवस्था व त्याची फारशी माहिती नसल्याने सहसा कोणी पर्यटक इकडे येत नाहीत. परंतु गडाचे उर्वरीत अवशेष, राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या उपक्रमाच्या खुणा, जैवविविधतेने भरभरुन ओसंडणारं जंगल, पडसाळी गाव व धरण परिसर ह्या सर्वांसाठी म्हणून एकदा तरी दुर्गप्रेमींनी मुडागडाला आवर्जून भेट द्यावी. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा व निसर्गाच्या शुध्दतेतून नवीन उमेद घेऊन मुडागडाची सफर एका दिवसात पूर्ण करता येते.
                    - शार्दुल प्रमोद पाटीलकागल



Wednesday 18 July 2018

किल्ले कर्णाळा


पक्षी अभयारण्याच्या अंतरंगात दडलेला – किल्ले कर्णाळा 


पनवेल पासून मुंबई – गोवा महामर्गावर अदमासे १३ कि.मी. वर कर्णाळा पक्षी अभयारण्य वसलेले आहे. ह्याच पक्षी अभयाराण्याच्या पोटातून एक उंच सुळका नजरेस येतो, हा सुळका म्हणजेच कर्णाळा किल्ला. सुट्टीसाठी पनवेल येथे काही दिवस राहण्याचा योग आला. दुर्गभटकंतीची आवड असल्यामुळे कोठेही गेलो तरी जवळपास असणारा एखाद-दुसरा किल्ला पाहण्याचा शिरस्ताच गेल्या कही वर्षांपासून पडला. अवघ्या १३ कि.मी. वर असणारा किल्ला व अभयारण्य न पाहता राहणे हे मानवणारं नव्हतं. कडकडीत उन्हाळा जरी असला तरी किल्ला बघायचा म्हटल्यावर पर्वा कशाची ?
            एक दिवस सकाळी कॅमेरा उचलला, पाण्याची बाटली घेतली, डोक्याला शिरस्त्राण घातले व मारली बसकण गाडीवर. भल्या सकाळीच बाहेर पडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारच कमी होती. कही वेळातच पनवेल मधून बाहेर पडलो तर समोरच कर्णाळ्याचा सुळका खुणावू लागला. सुमारे अर्ध्या तासातच अभयारण्याच्या गेटवर पोहोचलो. गेटवर असणाय्रा अधिकाय्राकडून रितसर पावती घेऊन अभयारण्यात प्रवेश केला. 
अभयारण्यात प्रवेश करताच माकडांच्या एका टोळीने स्वागत केलं. तीन – चार मादया, दोन नुकतेच वयात आलेले नर व काही पिल्ली. मला पाहताच पिलं आपापल्या आईला जाऊन बिलगली. आयांनी अंदाज घेत मला रस्ता मोकळा करुन बाजूचे झाड जवळ केले तर एक थोटया हाताचा नर तसाच रस्त्याकडेला बसून राहिला. जणू काय तो मला जाणवून देत असावा की, हे क्षेत्र माझे आहे. सूर्योदया बरोबर अभयारण्यात पोचल्यामुळे पक्षी निरीक्षणाची योग्य वेळ साधली गेली. अभयारण्यात मोरटका, हरियाल, ताडबा अशा वेगवेगळ्या निसर्गवाटा आहेत. सरळ गडवाट जवळ न करता साडेचार चौ. कि. मी. च्या परिसरात पसरलेल्या अभयारण्यात फेरफटका मारुन मग गडावर जायचे ठरवले.

        एकटाच असल्यामुळे आज भटकताना कसलेही बंधन नव्हते. सकाळच्या रम्य वातावरणात अगदीच प्रसन्न वाटत होते. उन्हामुळे वाळलेल्या गवताला आलेला सोनेरी रंग सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांत आणखीन झळाळून निघत होता. गळून पडलेल्या पानांचा झाडाखाली गालिचा पसरला होता. काही झाडांना नुकतीच नवीन पालवी येत होती. करवंदाच्या जाळीला आलेली कच्ची करवंदे ओरडून सांगत होती, ‘आम्ही येतोय !’. मोराने आपल्या प्रेयसीला बोलवण्यासाठी घातलेली साद, कोकीळेची तान, हळद्याची शिटी, कवड्याचा हुंकार, माझ्या जंगलातील अस्तित्वाची जणीव होताच कळपाला सावध करण्यासाठी नर वानराने केलेला हुहुहुप असा इशारा ह्या सर्वांतून निर्माण होणाय्रा मधुर संगीतात मिसळणारा माझ्या पावलांचा आवज. हे निसर्गाच संगीत, निरनिराळे पक्षी, वृक्षराज, वेली, फुले न्याहाळत एकटाच भटकताना एक वेगळाच अनुभव येत होता. असाच चालत चालत एका वळणावर पोचलो तर समोरच साधारण १५-२० फुटांवर एक कोल्हा येउन थबकला. त्याच्या अनपेक्षीत समोर  येण्याने मी व माझ्या अनपेक्षित समोर येण्याने तो दोघेही दचकलो. हातातला कॅमेरा सावरेपर्यंत त्याने जंगलात धुम ठोकली.
गरुड, हळदया, मोर, घार, तांबट, धनेश असे साधारण ३० ते ४० प्रजातींचे पक्षी भटकंती दरम्यान पहायला मिळाले. असाच रमत गमत भटकत दोन अडीच तासात अभयारण्यात ठेवलेल्या पक्षांच्या पिंजय्रा जवळ पोचलो. मुक्तपणे आकाशात विहार करणारे पक्षी अशा सुंदर वातावरणात पहायचे सोडून पिंजय्रात कैद असणारे पक्षी पाहण्यात समाधान मानणाय्रा पर्यटकांची कीव आली. येथेच वनविभागाचे विश्रामगृह व चहा – नाष्टा मिळणारे एक उपाहारगृह आहे. ह्या परिसरात वनविभागाने विविध माहिती फलक लावलेले आहेत.
विश्रामगृहाच्या बाजूनेच गडावर जाणारी वाट आहे. विश्रामगृहाजवळ कही वेळ विश्रांती घेऊन गडाची वाट जवळ केली. येथुन पुढे किल्ल्याच्याचढाईला सुरुवात होते. किल्ल्याची ऊंची ८४५ मी. जरी असली तरी हा चढ चांगलाच खडा व दमछाक करणारा होता. पायवाटेच्या दुतर्फा असलेल्या गर्द वनराईमुळे उन्हाचा तडाखा थोडा कमी जाणवत होता. काही अंतराच्या चढाईनं तर डोंगर माथ्यावरील सपाटीवर येऊन पोचलो. ह्या सपाटीवरुन सह्याद्रीचे आगळे – वेगळे रुपडे दर्शन देऊ लागले. वर्षाच्या तिन्ही ऋतुत सह्याद्री आपणाला स्वतःचे वेगळे दर्शन घडवतो. वर्षाऋतूत पावसाच्या असंख्य जलधारांनी न्हाउन हिरवेगार वस्त्र परिधान केलेला सह्याद्री, हिवाळ्यात सर्वांगावर सोनेरी गवताची लव पांघरलेला एखाद्या पितांबर नेसलेल्या ऋषी प्रमाणे वाटणारा सह्याद्री तर उन्हाळ्यात तालमीतली तांबडीमाती अंगाला फासून घेतलेल्या काळ्याकभिन्न मल्लासारखा भासणारा सह्याद्री.

ह्या सपाटीवरुन सरळ समोर कर्णाळ्याच्या माथ्यावर असणारा सुळका खुणावू लागला. किल्ल्यावर जाणारी पायवाट पूर्ण मळलेली असल्यामुळे व ठिकठिकाणी शिरढोणच्या क्रांतिकारी मित्र मंडळाने फलक लावले असल्यामुळे वाट शोधण्याची गरज लागली नाही. आणखी थोडी चढाई केल्यानंतर कर्नावती मंदिराजवळ येऊन पोहोचलो. मंदिरात कर्नावती देवीची सिंहावरुढ मूर्ती आहे. येथून काही अंतरावरच किल्ल्याच्या पायय्रा व दरवाजा आहे. या बाजूने किल्ल्याला ३०-४० पायय्रा आहेत. या पायय्रा चढून गडाच्या पहिल्या दरवाजात पोचलो. ह्या दरवाजाची बरीचशी पडझड झालेली आहे. येथून आणखी काही पायय्रांवर दुसरा दरवाजा आहे. दरवाजावर दगडात शरभ शिल्प, तर चौकटीत कमळ पुष्प कोरलेले दिसले. हा दरवाजा बराच सुस्थितीत असल्यामुळे गड पाहण्याचा उत्साह द्विगुणित झाला. येथून जवळच तिसरा दरवाजा आहे. तीसय्रा दरवाजातून आत जाताच गडमाथ्यावर येऊन पोहोचलो.
गडमाथा अगदीच आटोपशीर असल्यामुळे मन काहीसे हिरमुसले. बुरुजावर फडकणाय्रा भगव्या ध्वजाला मुजरा घालून मोर्चा गडावरच्या अवशेषांकडे वळवला. गडावर फारसे कोणी पर्यटक नसल्यामुळे गड अगदी सवडीने पाहता आला. ध्वजाच्या समोरच वाडयाचे अवशेष आहेत. सध्या या वाड्याचे छत कोसळलेले आहे. येथे जवळच आणखी काही पडके अवशेष व तटबंदी आहे. तटबंदीत बरीच झाडे वाढलेली आहेत. हे सर्व पहात सुळक्यच्या पायथ्याला आलो अन पाहतो तर काय ? काळया कातळात कोरलेली ८-१० पाण्याची टाकं. वाकून आत पाहिलं तर सर्व टाक्यांत पाणी पण जवळ – जवळ सर्वच टाक्यांतील पाण्यावर हिरवे शेवाळ पसरलेले. पाहत पुढे गेलो तर शेवटच्या टाक्यातील पाणी मात्रअगदी स्वछ व नितळ होते. टाक्यात उतरुन थोडे पाणी पिऊन बघितले तर पाणी अगदी चवदार व थंड होते. स्वतः सोबत आणलेले पाणी जवळच्या एका झाडला घालुन टक्यातील पाण्याने रसनेची तहान भागवली.
त्या ऊंच सुळक्याला वळसा घालून किल्ल्याच्या दुसय्रा भागात पोहोचलो. ह्या भागात तटबंदी, दोन
बुरुज व माचीवर जण्यासाठी दरवाजा आहे. ह्या दरवाजाच्याही दोन्ही बाजूस शरभ शिल्पे कोरलेली आहेत. दरीतून येणारी वाय्राची झुळूक व दरवाजाच्या कमानीची सावली यामुळे येथे छान गारवा जाणवत होता. दरवाजाच्या उंबय्रात बूड टेकून सभोवतालचा निसर्ग न्याहाळत काहीवेळ विश्रांती घेतली. येथून सभोवार पाहिले असता मुंबई- गोवा महामार्ग, माथेरान, मदनगड अशी ठिकाणे नजरेत येतात. परत पुन्हा पाण्याच्या टाक्यातून पाणी भरुन घेतले व परतीचा मार्ग धरला.
सातवाहन काळात खोदलेली पाण्याची टाकं, त्यानंतर निजामशाहीचा अंमल, १६५७ ला स्वराज्यात दाखल झाला. पुरंदरच्या तहात मोघलांकडे किल्ला गेला परत काही वर्षातच स्वराज्यात सामील झाला वा त्यानंतर पेशव्यांकडून १८१८ मध्ये इंग्रजांनी जिंकला. त्यानंतर स्वातंत्र्य युध्दात वासुदेव बळवंत फडक्यांनी ह्या किल्ल्याच्या आश्रयाने इंग्रजांशी काही काळ लढा दिला. अशी वेगवेगळी इतिहासाची पाने उलगडणारा हा किल्ला आज अखेरची घटका मोजत आहे.
मुंबई पुण्याहून येणारे पर्यटक येथे येऊन इथल्या इतिहसाच्या पाऊलखुणा अनुभवयच्या सोडून आपल्या प्रेमाचे गोडवे येथील दगड भिंतीवर लिहिण्यात धन्यता मानत आहेत. कर्णाळा अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होणे फारच गरजेचे आहे. तरच आपल्या पुढच्या पिढ्या इतिहासाचे पान उलगडून पाहू शकतील.
- शार्दुल प्रमोद पाटील, कागल






Wednesday 17 January 2018

पतंग



पतंग


मकर संक्रांत! ज्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो, त्या तिथीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. सूर्य उगवण्याची जागा या दिवसा पासून उत्तरे कडे सरकत जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. महाराष्ट्रात हा सण भोगी संक्रांत व किंक्रांत सा तीन दिवस साजरा केला जातो.
            संक्रांत म्हटलं की काही गोष्टी प्रकर्षांनं आठवतात - पहिली भोगीची भाजी व बाजरीची भाकरी या दिवसात शेतातील पिके लेली असल्यामुळे  हरभरा, शेंगदाणे, गाजर, वाटाणे, वांगी, वरना अश्या भाज्या एकत्र
करून भोगीची भाजी केली जाते. त्याबरोबर कोर्ट्याची चटणी व बाजरीची भाकरी खाल्ली जाते. दुसरी गोष्ट तिळगुळ, तीळ व गुळ एकत्र करून त्याच्या वड्या किंवा लहान लहान लाडू केले जातात ते  “तिळगुळ घ्या व गोड गोड बोला”, म्हणत सर्वांना वाटले जातात. तिळ गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्यामुळे वाढत्या थंडीत शरीरासाठी उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
            शेवटची पण सर्वात जास्त आनंद देणारी व लहान-थोर सर्वांनाच आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे, पतंग! रंगीबेरंगी रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, काही कान डोळे असणारे, काही शेपटीचे तर काही बिनशेपटीचे, आकाशात उंच उंच उडणारे पण  जमिनीशी घट्ट नाते असणारे पतंग !
            जसजसा कामाचा व्याप वय वाढत गेलं तसतसे बालपणीच्या बऱ्याच गोष्टी सुटत गेल्या  लहानपणी संक्रांत जवळ आली की  दहा-पंधरा दिवस फक्त पतंग, पतंग आणि पतंगच सुचत असे. शाळेतून आल्यावर घरात दप्तर फेकतच आम्ही घराजवळच्या माळावर पतंग घेऊन हजर. तिथे पतंग उडवायला आधीच तीस-चाळीस जण
हजर असत. त्या सगळ्यांचा गलका, चढाओढ, पतंगांची स्पर्धा सगळं अगदी जोरदार पणे सुरू असे. जसजसा काळ बदलला, तसतसे खेळ बदलले आणि जे पतंग पूर्वी अगदी पन्नास-साठच्या संख्येने दिसायचे ते जवळजवळ  नाहीसेच झाले. कुठे तरी एखाद दुसराच आकाशात दिसू लागला.
आज १३ जानेवारी भोगी व योगायोगाने शनिवार आला. उद्या रविवारची सुट्टी असल्याने मी सकाळीच ठरवलं की आज संध्याकाळी माळावर पतंग घेऊन हजर व्हायचं. कोणी असो वा नसो, ते जुने सवंगडी भेटणं तर शक्यच नव्हतं पण आपण जायचं, पतंग उडवायचा व पतंगा सोबत मनाला पण आकाशात व बालपणीच्या आठवणी स्वच्छंद भरारी घेऊ द्यायची. दुपारी कॉले सुटता घर गाठलं. विकत आणून पतंग उडवण्यात मजा ती कसली ? म्हणून पतंग स्वतः करायचा ठरवला. घरातीलच एक पुस्तकांना कव्हर घालायचा कागद घेतला, कात्री, डिंक,दोन काटक्या घेऊन पतंग करायला सुरवात केली. मदतीला आमची दोन वर्षांची कन्या हजार! बरीच वर्ष पतंग केला नसल्यामुळे बरच काही विस्मृतीत गेलं होतं. जुनं जुनं सगळ पुन्हा नव्याने आठवुन पतंग केला व तो जमलाही. त्याला एक लांबलच शेपूटही जोडलं. तंग तर जमला पण, आता खरा प्रश्न पडला तो म्हणजे, सुत कसं बांधायचं ? घ्या आली पंचाईत ! कस तरी आठवून सुत बांधलं, टेरेसवर जाऊन थोडं वाय्राला धरून बघितले तर तेही जमलं होतं. आजच्या मोहिमेची तयारी तर पूर्ण झाली. घरात मिळाली ती दोऱ्याची गुंडी उचलली, सोबत आमचा छोटा सैनिक घेतला व बाहेर पडलो. बाहेर आलो तर दारातच माझे तीन-चार लहान मित्र की ज्यांच्या सोबत मी नेहमीच काहीना काही उनाडक्या करत असतो ते “काका! काका! तुम्ही पतंग डवणार काय ?” म्हणत पळत आले. मनात आनंद झाला, म्हटलं चला दोन-चार साथीदार तरी मिळाले.
टीम तर तयार झाली, पण खरी कसोटी तर पुढे होती. पतंग उडवणे हे फार जिकिरीचे व कौशल्याचे काम होते. दोरा बांधला व एकाच्या हातात गुंडी दिली, पतंग रून एकाला उभे केले व मांजा माझ्या हातात घेतला. वाऱ्याचा अंदाज घेतला व पतंग वाल्याला आरोळी दिली “टाक वर”. वाऱ्या बरोबर पतंग वर उडाला आणि १०-१५ सेकंदातच गिरक्या घेत जमिनीवर आदळला. परत त्याला पतंग उचलायला सांगीतला व परत वाऱ्याचा अंदाज घेऊन आरोळी दिली, गंमत म्हणजे परत परिणाम तोच. असं साधारण पाच-सहा वेळा तरी झालं. मन थोडसं खट्टू झालं, पण प्रयत्न सोडणे हे स्वभावात नसल्यामुळे पतंग उचलणं व परत उडवण सुरूच राहिलं. समाधानाची बाब इतकीच होती की दर वेळी पतंग काही जास्त वेळ आकाशात रहात होता. पुढच्या आठ-दहा प्रयत्नात आकाशात पतंग स्थिर ठेवण्यात यशस्वी झालो. जसजसा पतंग आकाशात उंच भरारी घेऊ लागला तसे सर्वच आनंदी झालो आणि मी माझ्या बालपणीच्या आठवणीत रमलो.
        आम्हाला पतंग उडवताना पाहून आसपासचे दोघे तिघेही पतंग घेऊन आले. आमच्या सोबत तेही पतंग उडवु
लागले. थोडं बरं वाटलं की अजूनही कुणीतरी उत्सुक आहे. अशीच पंधरा-वीस मिनिटे निघून गेली व खरी गंमत सुरू झाली – काटा-काटी’. मग काय ? नुसता दंगा आणि रोळ्यांना त आला, ‘ताण दे –ताण दे’, ‘दोरा गुंडाळ’,’दे हिसडा’, त्यात काही आमच्या कोल्हापुरात लाडाने उच्चारले जाणारे फुल्या-फुल्यांचे *** शब्द यांनी सगळा माळ दुमदुमून गेला आणि इतक्यात पहिला पतंग काला गेला,  तो नेमका माझाच. काटलेला पतंग परत नाही मिळवला तर मग तो मी कसला ? हातातली गुंडी तिथेच टाकून अगदी सातवी-आठवीच्या पोरासारखं पतंगाच्या मागे धूम ठोकली माझ्या मागे आमच्या बाल चमूने. नजर वर पतंगावर असल्यामुळे पायाकडे कोण बघत? दगड, माती, गवत, झुडूप, काटे कसलेही भान राहिले नाही. पतंग पण चांगलाच ४००-५०० मीटर लांब जाऊन पडला. एकदाचा पतंग हातात घेतला आणि मगच पाय थांबले. एखादा वल्डकप मिळवावा अशा आविर्भावात घामानं निथळत, धापा टाकत परत आलो. पुन्हा पतंग दोरीला बांधला व दिला आकाशात सोडून. चांगला अंधार पडे पर्यंत, नवीन सवंगडी व जुन्या आठवणींना उजाळा देउन पतंग मकर संक्रांत गोड करून गेला आणि जाताना कानात एकच म्हणाला, “मित्रा! अजूनही तू बच्चा आहेस, असाच रहा”.
                                                                                                         -शार्दुल प्रमोद पाटील.